Monday, February 26, 2007

सुटका..

६ वर्षांचा गंपू त्यच्या घराच्या एक कोप-यात अवघडून बसला होता. त्याच्या घरात आज बरीच वर्दळ सुरू होती. पोलीसही आले होते."पंचनामा", "विषप्रयोग" असले काही शब्द त्याच्या कानावर पडत होते. पण त्यांचा अर्थ कळण्याएवढा तो अजुन मोठा झाला नव्हता.....

गंपू ४ वर्षांचा असतानच त्याची आई गेली. बाबांनी वर्षभरातच नविन लग्न केलं होतं. गंपूचे बाबा म्हणजे त्या शहरामधली एक बडी असामी होते. श्रीमंत, कर्तबगार, कर्तृत्ववान माणूस.त्याच्या सावत्र आईने त्याच्या बाबांशी लग्न केलं, ते केवळ त्यांच्या पैशांच्या मोहाने, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वछ होती.त्यांच्या पैशावर मनसोक्त मजा मारणे हेच तिचे काम होतं.त्यामुळे त्यांची बरीच भांडणंही होत.ह्या सर्व त्रासामुळे त्याच्या बाबांना दारूचे व्यसन लागलं होतं. निद्रानाशाचा विकारही जडला होता. रात्रभर दारू पिऊन ते पहाटे कधीतरी झोपी जात.

साहजिकच त्या व्यसनांपायी गंपूचे बाबा त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले होते.ते त्यच्याशी दोन शब्दही धड बोलत नसत.त्याला फ़ारसे मित्रही नव्हते. त्यामुळे शाळेतून घरी आलं की गंपूला घर खायला उठायचं.नाही म्हणायला त्याची मावशी त्याच शहरात रहायची. तिला स्वतःचं मुलबाळ नसल्यामुळे तिचा गंपूवर फार जीव होता. तिच्याकडे जायला मात्र त्याला फार आवडायचे. ती त्यच्यासाठी छान छान पदार्थ करून त्याचे सगळे लाड पुरवायची. गंपू तिला अनेकदा विचारायचा देखील, "मावशी, मला कायमचं तुझ्याकडे नाही रहाता येणार?"
त्यावर ती काय बोलणार? नुसतं हसून ती विषय बदलायची.

त्याच्या बाबांच्या खुनाच्या आरोपावरून त्याच्या सावत्र आईला अटक झाली.काल रात्री ते दोघंही रोजच्याप्रमाणे भरपूर दारू पिऊन झोपून गेले होते. सकाळी बघितलं तेव्हा मात्र त्याचे बाबा जिवंत नव्हते.दारूतनंच विष दिलं असावं असा पोलिसांचा संशय होता.खुनाला सबळ कारणही होतं.त्याच्या बाबांनी उतरवलेल्या विम्याला नुकतंच एक वर्ष पुर्ण झालं होतं. त्यामुळे आता त्यांचा मृत्यू झाला असता, तर कायद्याप्रमाणे, ती सगळी रक्कम त्याच्या आईला मिळणार होती. त्याच्या मावशीनं ह्यापुढे त्याची काळजी घ्यायचं मान्य केलं होतं.त्यामुळे मात्र गंपू खूष झाला होता.

त्या रात्री मावशीच्या घरी जेवताना गंपू तिला म्हटला, " मावशी, माझ्या दुस-या आईने बाबांचा मर्डर केला असं पोलिस सांगत होते. मर्डर म्हणजे काय गं? ?"

"तुला नाही कळायचं ते इतक्यात. अजुन लहान आहेस तू."

"आणि मावशी, परवा नाही का मी तुला विचारलं तेव्हा तू म्हणत होतीस , की ते सीरियल मधे दाखवतात ते सगळं खोटं असतं म्हणून.. "

"हो रे बाळा. चुकलं माझं. तशा हलकट बायका खरोखरंच असतील असं वाटलं नव्हतं मला."

" मग मी , त्या सीरियलमधल्या बाईप्रमाणे, काल बाबांच्या झोपेच्या गोळ्या त्यांच्या दारूत हळूच मिसळल्या, तशा माझ्या दुस-या आईच्या दारूत मिसळल्या, तर तीही देवाघरी जाईल?
सांग ना मावशी.. मावशी? तुला काय झालं? तू एवढी घाबरली का आहेस?तुला काय होतंय? मावशी!!! मावशी!!............"

5 comments:

Shashank Kanade said...

तू हा लेख काय हेतू ने लिहिलास माहित नाही.
पण tv serials चे फार विपरित परिणाम होतात हे नक्की.
लहान मुलांनी शक्तीमान येवून वाचवेल ह्या आशेने building वरून उड्या मारल्याचं ऐकिवात आहे!

Gayatri said...

प्रसाद, शेवटच्या परिच्चेदापर्यंत येईपर्यंत ' हे काय बळंच लिहिलंय' असं वाटत होतं. धक्कातंत्राचा वगैरे वपर करणार आहेस याची पुसटशीही कल्पना आली नाही. अर्थात 'पूर्णपणे फसवणूक' झाली, आणि म्हणूनच गोष्ट म्हणून आवडला तुझा लेख.

पण शशांक म्हणतो तसं, प्रसारमाध्यमांच्या परिणामांबद्दल पुन्हा एकदा विषाद आणि विस्मय वाटल्यावाचून राहिला नाही. वाईट हेच वाटतं की अगदी उच्चशिक्षित, वयस्कर लोकही आपल्या नातवंडांचं "टी व्ही लावला की अगदी एकाग्रतेने डोळे खिळवून बसते/ बसतो" असं कौतुक करताना आढळतात! मुलांना खेळांची, प्रकल्पांची आवड लावणाऱ्या आनंदभवन, विज्ञानशोधिकेसारख्या प्रकल्पांचं कौतुक वाटतं ते याच्यामुळेच.

Unknown said...

फारच धक्कादायक शेवट! :| 2 मिनिटं काही सुचलंच नाही! हा (आणि असे लेख) त्या सिरियलवाल्यांना द्या कुणीतरी! मागे मायबोली.कॉम वर (बहुतेक GS1 यांनी) याच विषयावर एक कथा लिहीली होती, त्यात लहान मुलं tv वर पाहून एका मुलीला झाडाला फासावर टांगतात वगैरे.. फार भयानक होती ती कथा..
शशांक म्हणाला तसेच, शक्तीमानच्या काळात सुद्धा किती लहान मुलांचा जीव गेला, अशा उड्या-बिड्या मारून..हे खरंच बदललं पाहीजे.. :(

Prasad Chaphekar said...

तुमच्या कॉमेंट वाचून मीही विचारात पडलो. कारण हा लेख काही मी "सीरीयलचे दुष्परिणाम" ह्याच्यावर लिहायचा असं ठरवून लिहीला नव्हता. एक धक्कादायक गोष्ट लिहावी म्हणूनच केवळ मी तो लिहीला होता.पण माझ्या लेखामधला हा नवा पैलू प्रकाशात आणल्याबद्दल धन्यवाद!! :D

Anonymous said...

Ekdum sunder hoti gosht