Monday, February 26, 2007

सुटका..

६ वर्षांचा गंपू त्यच्या घराच्या एक कोप-यात अवघडून बसला होता. त्याच्या घरात आज बरीच वर्दळ सुरू होती. पोलीसही आले होते."पंचनामा", "विषप्रयोग" असले काही शब्द त्याच्या कानावर पडत होते. पण त्यांचा अर्थ कळण्याएवढा तो अजुन मोठा झाला नव्हता.....

गंपू ४ वर्षांचा असतानच त्याची आई गेली. बाबांनी वर्षभरातच नविन लग्न केलं होतं. गंपूचे बाबा म्हणजे त्या शहरामधली एक बडी असामी होते. श्रीमंत, कर्तबगार, कर्तृत्ववान माणूस.त्याच्या सावत्र आईने त्याच्या बाबांशी लग्न केलं, ते केवळ त्यांच्या पैशांच्या मोहाने, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वछ होती.त्यांच्या पैशावर मनसोक्त मजा मारणे हेच तिचे काम होतं.त्यामुळे त्यांची बरीच भांडणंही होत.ह्या सर्व त्रासामुळे त्याच्या बाबांना दारूचे व्यसन लागलं होतं. निद्रानाशाचा विकारही जडला होता. रात्रभर दारू पिऊन ते पहाटे कधीतरी झोपी जात.

साहजिकच त्या व्यसनांपायी गंपूचे बाबा त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले होते.ते त्यच्याशी दोन शब्दही धड बोलत नसत.त्याला फ़ारसे मित्रही नव्हते. त्यामुळे शाळेतून घरी आलं की गंपूला घर खायला उठायचं.नाही म्हणायला त्याची मावशी त्याच शहरात रहायची. तिला स्वतःचं मुलबाळ नसल्यामुळे तिचा गंपूवर फार जीव होता. तिच्याकडे जायला मात्र त्याला फार आवडायचे. ती त्यच्यासाठी छान छान पदार्थ करून त्याचे सगळे लाड पुरवायची. गंपू तिला अनेकदा विचारायचा देखील, "मावशी, मला कायमचं तुझ्याकडे नाही रहाता येणार?"
त्यावर ती काय बोलणार? नुसतं हसून ती विषय बदलायची.

त्याच्या बाबांच्या खुनाच्या आरोपावरून त्याच्या सावत्र आईला अटक झाली.काल रात्री ते दोघंही रोजच्याप्रमाणे भरपूर दारू पिऊन झोपून गेले होते. सकाळी बघितलं तेव्हा मात्र त्याचे बाबा जिवंत नव्हते.दारूतनंच विष दिलं असावं असा पोलिसांचा संशय होता.खुनाला सबळ कारणही होतं.त्याच्या बाबांनी उतरवलेल्या विम्याला नुकतंच एक वर्ष पुर्ण झालं होतं. त्यामुळे आता त्यांचा मृत्यू झाला असता, तर कायद्याप्रमाणे, ती सगळी रक्कम त्याच्या आईला मिळणार होती. त्याच्या मावशीनं ह्यापुढे त्याची काळजी घ्यायचं मान्य केलं होतं.त्यामुळे मात्र गंपू खूष झाला होता.

त्या रात्री मावशीच्या घरी जेवताना गंपू तिला म्हटला, " मावशी, माझ्या दुस-या आईने बाबांचा मर्डर केला असं पोलिस सांगत होते. मर्डर म्हणजे काय गं? ?"

"तुला नाही कळायचं ते इतक्यात. अजुन लहान आहेस तू."

"आणि मावशी, परवा नाही का मी तुला विचारलं तेव्हा तू म्हणत होतीस , की ते सीरियल मधे दाखवतात ते सगळं खोटं असतं म्हणून.. "

"हो रे बाळा. चुकलं माझं. तशा हलकट बायका खरोखरंच असतील असं वाटलं नव्हतं मला."

" मग मी , त्या सीरियलमधल्या बाईप्रमाणे, काल बाबांच्या झोपेच्या गोळ्या त्यांच्या दारूत हळूच मिसळल्या, तशा माझ्या दुस-या आईच्या दारूत मिसळल्या, तर तीही देवाघरी जाईल?
सांग ना मावशी.. मावशी? तुला काय झालं? तू एवढी घाबरली का आहेस?तुला काय होतंय? मावशी!!! मावशी!!............"

Saturday, February 24, 2007

बिन विषयाच्या चारोळ्या

१. स्वतः स्वतःशीच बडबडण्याचा,
आता कंटाळा यायला लागलाय,
म्हणून तर हा पठ्ठ्या,
आता चारोळ्या व्यायला लागलाय!!

२.बिन विषयाच्या लेखावर,
ही एक बिन विषयाची चारोळी,
शब्दांच्या जंगलातली,
एक फुकट गेलेली आरोळी!!

३. नव्वद टक्के चारोळ्या,
ह्या प्रेयस्यांवरती का असतात?
बाकी जग सोडून,
ह्यांना फक्त मुलीच का दिसतात?

४. मोठा चारोळीकार बनावं,
असा मनात ध्यास आहे,
तेवढ्या चारोळ्या काही सुचत नाहीत,
हाच फक्त त्रास आहे!!

५. चारोळीला विषय हवा,
असा वाचणा-यांचा आग्रह असतो,
माझ्या चारोळीला विषय नसणार,
असा मग माझाही निग्रह असतो!!

६. सगळे जर करतात,
तर माझीही एक चारोळी एका मुलीवर,
तिचे रूप, तिचे डोळे,तिचे बोलणे आठवून
माझे हृदय होते खालीवर!!!!

Thursday, February 22, 2007

अगम्य भाषेत लिहिणा-यांनो.....

अगम्य भाषेत लिहीणा-यांनो,तुम्हाला माणसांच्या भाषेत का लिहीता येत नाही? आपण असलं काहीतरी आचरटासारखं लिहीलं म्हणजे त्याचं साहित्यीक मूल्य वगैरे वाढेल असं वाटतं की काय तुम्हाला?


साधं उदाहरण घ्या. समजा एखाद्या गोष्टीत असा प्रसंग आहे. एक प्रियकर आणि त्याची प्रेयसी चौपाटीवर उदास नजरेने, सूर्यास्त बघत कसलासा विचार करत बसलेत आणि तो तिला काहीतरी सांगायला जातो. बस्स, प्रसंग एवढाच असतो. आता हे अ.भा.लि.( तेच ते वरचे, अगम्य भाषेत लिहीणारे) लोक त्याचं वर्णन कसं करतात बघा.

सूर्यास्ताची वेळ झाली होती. सूर्याचं पूर्णबिंब हळूहळू पाण्यात बुडायला लागलं होतं. ते मनोहर दृश्य बघताना त्या दोघांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं( हा "काहूर" शब्द ह्या लोकांना फार आवडतो. जिथे संधी मिळेल तिथे तो लेंडी सारखा टाकत जातात.).कदाचित भविष्याची स्वप्न पडत असतील त्या दोघांना.दूर सागरामधे मच्छीमार परत यायची तयारी करताना दिसत होते(आता वास्तविक ह्याचा काय संबंध आहे?.. पण नाही. सुरू आहे ह्यांची वातावरण निर्मीती.....)सगळा आसमंत त्या समुद्राच्या विशिष्ट वासानी धुंद झाला होता.( कुठल्याही कारणानी ह्यांचा आसमंत धुंद व्हायला वेळ लागत नाही. मग ते समूद्र असो, धुके असो, अत्तर असो वा आणखी काही असो.जणू काही तो धुंद व्हायलाच टपलेला असतो.).त्या धुंद (पुन्हा धुंद!!) वातावरणात त्याने आपला हात तिच्या हाताच्या दिशेने सरकवला. ( हरे राम! अजुन हात पण हातात घेतलेला नाही. हे तर त्या "दामिनी" serial च्या वरताण व्हायला लागलंय!!)अखेरीस त्याने तिचा हात हातात घेतला( हुश्श!!!) व दुस-या हाताने तिचे मुखकमल(??) आपल्याकडे वळवले. तिच्या टपो-या डोळ्यात पाणी तरारलं होतं.( नायिकेचे डोळे टपोरे नसले तर जणू काही यांचे पितर नरकात खितपत पडतील.) . भास्कराचे( इथे सूर्याला काहीतरी भरदार शब्द हवाच!) मावळते प्रतिबिंब त्या अश्रूत दिसत होते. ते बघून तो तिला म्हणाला,".....


हे एवढं वर्णन वाचेपर्यंतच त्या लेखकाला एवढ्या शिव्या मोजाव्याश्या वाटतात की पुढे वा़चायची इच्छा आणि त्राण, दोन्ही संपून जातं.अरे शिंच्या, तो तिला काय म्हटला ते सांग की लवकर. हा आधीचा नसता केरकचरा कशाला? हे असले लिहीणारे धन्य, आणि वाचणारे त्याहून धन्य!!


विहीरीमधे मीठ टाकून तिचे पाणी खारं केलं म्हणजे काय तिचा समूद्र थोडीच बनतो?उलटं त्या विहीरीपाशी येऊन पाणी पिणारे लोकही यायचे बंद होतात.जे काय लिहायचं ते सामान्य माणसाला वाचून कळेल, व पुढे वाचावसं वाटेल, असं लिहावं की. हे नसत्या शब्दांच्या मीठाचे ढिगारे टाकून लेखन खारं कशाला बनवायचं ?

Tuesday, February 20, 2007

एक फालतू कविता(?)....

कविता करण्यास बसलो आहे
पण करता येत नाही !!

आधी शब्द सापडत नाही,
आणि सापडला तर...
तो हवा तो अर्थ घेत नाही !!

यमके जुळवायची सारी खटपट,
ती जुळत नाहीतच, जुळली तरी....
त्यांची कविता होत नाही! !!

लिहायचं असतं काहीतरी अर्थगर्भ,
शब्दांचं एक घट्ट मिश्रण, ही असली
शब्दांचे बाण हवेत नाही!!

म्हणता म्हणता झाली तीन कडवी(अगदी नावाप्रमाणेच कडू..)
आणि हे चौथं( की चोथा?), तरीही..
हवा तो अर्थ अभिप्रेत नाही!!