Thursday, May 26, 2011

एक जनरल प्रॉबलेम...

मी उद्या तुला भेटणार,
सगळं सांगायचं ठरवणार,
फोन लावायला जाणार,
नंबर दाबताना हात थरथरणार,
न लावताच मग कट करणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

शेवटी धीर करून नंबर लावणार,
तू पण नेमका दहादा रिंग वाजल्यानंतरच उचलणार,
तोपर्यंत माझे बी.पी वर खाली होणार,
शेवटी तुझा आवाज ऎकू येणार,
घशातला श्वास घशातच अडकणार,
काही न बोलताच मग फोन ठेऊन देणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

शेवटी फोनचा नादच सोडून देणार,
सरळ तुला facebook वर message करणार,
अमुक वेळी तमुक जागी तुला भेटायला बोलावणार,
'send' वर click करण्याआधी दहादा बाथरूमला जाणार,
"साल्या एवढा कशाला घाबरतोस रे?" असं मीच माझ्यावर चिडणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

मग तुझ्या replyची वाट बघत बसणार,
मिनिटाला शंभरदा facebook चेक करणार,
"अजून कसा येत नाही?" असं स्वतःवर चरफडणार,
शेवती वैतागून computer बंद करणार,
५ मिनिटात झक मारत चालू करणार,
शेकडो तासांनंतर तुझ reply येणार,
तू पण नुसतं "हो, येते की", एवढंच लिहीणार,
" तिला काय वाटलं असेल?" म्हणून मी उगाचच अस्वस्थ होणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

मग त्या दिवशी मी तयार वगैरे होणार,
कधी नव्हे ती दाढी करणार,
"ठेवणीतले" कपडे बाहेर काढणार,
मग तिथे पोचणार, वाट बघणार,
तू दिसताच परत धडधड सुरू होणार,
पुढच्या कल्पनेने घाम फुटणार,
रुमाल पण नेमका घरी विसरणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

मग तू येणार,
आपण बोलायला लागणार,
मी मुख्य सोडून सगळे विषय काढणार,
शेवटी तू निघायची वेळ होणार,
मग मात्र मी हिंमत करणार,
तुला सगळं सांगून टाकणार,
मग श्वास रोखून धरणार,
च्यायला नेमकी तेव्हाच मला घाईची लागणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

मग तू भाव खाऊन घेणार,
२-३ दिवसांनंतर "हो" म्हणणार,
मग आपण "कपल" की काय ते होणार,
मग तुला शॉपिंगला न्यावं लागणार,
शॉपिंग करून थकल्यामुळे खायला घालावं लागणार,
तुझ्या सगळ्या नातेवाईकांचे वाढदिवस लक्षात ठेवायला लागणार,
तू घरी आलीस की माझी खोली आवरावी लागणार,
दिवसातून एक-दोनदा फोन करून रिपोर्टिंग करावं लागणार,
मित्रांना भेटणं अवघड होऊन बसणार,
थोडक्यात काय, माझ्यातला "मी" संपून "तू" सुरू होणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

त्यापेक्षा, तुला न सांगितलेलंच बरं.... :)

Monday, March 28, 2011

माझं पहिलं रसग्रहण - गोविंदायनमः..

माझ्या खूप सा-या मित्र-मैत्रिणिंना कवितेतलं खूप सारं कळतं (निदान माझ्यापेक्षा जास्ती कळतं एवढं तरी मलाकळलेलं आहे.) उदा. गायत्री, राहुल, प्रसाद,स्पृहा, मंदार वगैरे. ही मंडळी कवितांचे खो-खो वगैरे खेळतात. आता म्हणजे काय हे विचारू नका. त्यासाठी वेगळा ब्लॉग लिहावा लागेल. ते जे असेल ते असो. त्यामुळे ह्यांचे ब्लॉग वाचताना मला खूप insecure होतं. कारण मला कविता समजायला, यमक जुळलेलं असावं ही पहिली अट असते. आणि हे मारे वेगवेगळ्या निबंधात्मक कवितांची रसग्रहणं लिहीत असतात.

म्हणून आज हा माझा पहिला रसग्रहणाचा प्रयत्न आहे. पाचकळ आहे हे आधीच सांगून ठेवतो, तेव्हा वाचून हा लेख टराटरा फाडावासा वाटल्यास आमची जबाबदारी नाही. तर माझ्या पहिल्या रसग्रहणासाठी मी गोविंदा आजोबांचं एक गाणं निवडलं आहे.

"मैं तो रस्ते से जा रहा था" ह्या गाण्याचे शब्द वाचताना मला त्यात दडलेला खोल अर्थ जाणवला आणि म्हणून हा प्रयत्न (पाचकळपणा ऑलरेडी सुरू झाला आहे हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच)

" मैं तो रस्ते से जा रहा था
मैं तो भेलपूरी खा रहा था
मैं तो लडकी घुमा रहा था"-()

ह्या शब्दातून एका सामान्य चाकरमान्या वर्गातील होतकरू तरूणाचं वर्णन कवी करत आहे. तरूण बहधा कॉल-सेंटर (किंवा सॉफ्टवेअर कंपनी) मधे कामाला असल्यामुळे नीट जेवायला त्याला वेळ होत नाही रस्त्यावरच्या भेळपूरी वर त्याला गुजराण करावी लागत आहे. तरी पण तरूण हे सगळं हसत-मुखाने सहन करतआहे, कारण त्यची गर्लफ्रेंड त्याच्या सोबत आहे. ह्या ओळीवरून कवी आपल्याला प्रेमाची महती सांगत आहे, की प्रेम असेल तर घरात कीचनची गरज नसते.

"तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करू"-()

ह्या ओळीतून कवी दाखवून देतो आहे की गर्लफ्रेंडला मिर्ची लागल्यामुळे तरूण सैरभैर होऊन उपाय शोधत आहे. पण त्याला उपाय सापडत नाहीये. वास्तविक ह्यातली "मिर्ची" हे भ्रष्टाचाराचं प्रतीक असून सामान्य माणूस त्याच्यापुढे काहीच करू शकत नाही असं कवीला सांगायचं आहे. पण संगीतकाराने चुकीच्या शब्दावर जोरदिल्यामुळे तरूणाला त्याच्या "सामाना"ची काहीच फिकीर नाही, असा अत्यंत चुकीचा अर्थ आपल्या समोर येतो.

"मै तो रस्ते से जा रही थी,
मैं तो आई-स्क्रीम खा रही थी
मैं तो नैना लडा रही थी"-()

ह्या ओळीतून त्या प्रयसीची आपल्याला ओळख होते. ती एक अल्लड तरूणी असल्याची भावना मनात तयार होते. तिच्या प्रियकराबरोबर हिंडत, आजुबाजुची शोभा पहात आई-स्क्रीम खात आनंदाने चालली आहे. मध्यमवर्गीय संथ जीवनाचे प्रतीक म्हणून कवीला ही मुलगी उभी करायची आहे. (आता आई-स्क्रीम खात असताना हिला मिर्ची कशी लागली असा प्रश्न अजाण वाचकांच्या मनात येणं साहजिक आहे. आला असेल तर येऊ द्या. असल्या फाल्तू प्रश्नांची उत्तरं रसग्रहणात मिळत नसतात. इथे आम्ही गर्भित अर्थ शोधत असतो.)

"जले चाहे सारा जमाना,
चाहे तुझे तेरा दिवाना"-()
"संग तेरे मैं भाग जाऊँ,
नजर किसी को भी ना आऊँ"
"लोग दिलवालों से यार जलते हैं,
कैंसे बताऊँ क्या क्या चाल चलते हैं"

ह्या हृदयद्रावक कडव्यातून तरूण आता संघर्षाला तयार झाला आहे अशी उत्साहाची भावना मनात तयार व्हायला मदत होते. जिकडे तिकडे विरोध सहन करावा लागत आहे हे तर उघड आहे. थोडक्यात सांगायचं, तर हीरो त्याला विरोध करणा-यांना "तुमच्या नानाची टांग" असे सांगत आहे

"मैं तो गाडी से जा रहा था,
मैं तो सीटी बजा रहा था
मैं तो टोपी फिरा रहा था
तुझको धक्का लगा तो मैं क्या करूँ"

ह्या कडव्यातून कवी अत्यंत हुशारीने तो हीरो मुळचा पुण्याचा असल्याची जाणीव करून देतो. गाडीने जात असताना ड्रायव्हींग सोडून सगळं काही करत असणारा माणूस पुण्याचाच असू शकतो. असं असताना हीरॉईनला धक्का लागणं साहजिक आहे आणि तिने अधिक खबरदारी घ्यायला हवी होती ह्याची हीरो अत्यंत नम्र शब्दात तिला जाणीव करून देतो. कदाचित हे त्यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंगाचं वर्णन असू शकेल आणि त्यावेळच्या घटनांचं कवी हळुवारपणे वर्णन करतो.

"नई कोई पिक्चर दिखादे,
मुझे कहीं खाना खिलादे."
"जरा निगाहों से पिलादे,
प्यास मेरे दिल की बुझा दे"

ह्यातल्या पहिल्या दोन ओळीतून कवी वाढती महगाई त्यात सतत वाढणा-या मागण्या ह्याचे भीषण वर्णन करत आहे. तर दुस-या दोन ओळीत, मध्यमवर्गीय माणूस हळूच विषय बदलून ह्या मागण्यातून आपली कशी सुटका करून घेतो ह्याचे गमतीशीर चित्र आपल्याला पहायला मिळते. एकाच कडव्यात भयानक समस्या त्यावरचा सोप्पा उपाय सांगून कवी आपल्या अत्युच्च प्रतिभेची जाणीव करून देतो.

"आज तुझे जी भरके प्यार करना हैं"
"तेरी निगाहों से दीदार करना हैं"

ह्या ओळी चावट असल्यामुळे ह्यांचे रसग्रहण आम्ही चारचौघात करू शकत नाही. क्षमस्व.

"मैं तो ठुमका लगा रही थी
मैं तो गीत कोई गा रही थी
मैं तो चक्कर चला रही थी"-()

"तेरी नानी मरी तो मैं क्या करूँ"-()

ह्या कडव्यात कवीने जेव्हा हीरो आपल्या हिरविणीला आपल्या आज्जीला दाखवायला घेऊन जातो तेव्हाचं वर्णन केलं आहे. आज्जीने कौतुकाने मुलीला, "तुला काय काय येतं बाळ?" असं विचारल्यावर हिरविण आपल्या अंगभूत कलांचं प्रदर्शन मांडायला सुरवात करते. ते विश्वरूप दर्शन सहन झाल्याने आज्जी तडक देवाघरी जाते असा हा करूण प्रसंग कवीने हुबेहूब चितारला आहे. ह्या प्रसंगातून हिरविण पुरोगामी असल्याचे समजते तर तिच्या कला सहन होणारी आज्जी प्रतिगामी असल्याचे समजते. अशा रितीने त्या दोघांच्या मिलनातला अडथळा आपोआप देवाघरी गेल्याने हीरो-हिरविण आनंदाने नांदू लागले! अशा अत्यंत समर्पक प्रसंगावर कवी ह्या अतुलनीय काव्याचा शेवट करतो...


(गोविंदाच्या अभंगांच्या रसग्रहणाचे पुस्तकच छापावे असे आमच्या मनात आहे. ते वाचकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. वास्तविक विं.दा. करंदीकर ह्यांच्या कविता आणि ही असली गाणी, ह्या वर
"विंदा आणि गोविंदा- एक तुलनात्मक परिक्षण"
असा ग्रंथराज निर्माण करावा असेही आम्ही योजले आहे. बघू.)

Sunday, January 02, 2011

असल्या आयडीयाची कल्पना न केलेलीच बरी

कालच सचिन-अशोक सराफ-महेश कोठरेंचा "आयडीयाची कल्पना" ह सिनेमा पाहिला. "अशी ही बनवाबनवी"च्या दिग्दर्शकाकडून ही अपेक्षा नव्हती. आता प्रत्येक पिक्चर तेवढा चांगला होऊ शकत नाही हे माहित आहे मला, पण शेवटी काही किमान क्वालिटीची अपेक्षा करतोच ना!
मुळात ह्या सिनेमाची पटकथा खूपच ढिसाळ आहे. सचिन पिळ्गावकरसारखा दिसणारा एक होतकरू कलाकार जयराम ह्याला पोलिस कमिशनर महेश ठाकूर (महेश कोठारे) ह्यांच्या गाडीची धडक बसून तो थोडा वेळ बेशुद्ध होतो. गाडी कमिशनरची बहिण (भार्गवी चिर्मुले) चालवत असते. पण ती अपघात झाल्यावर तिथून पळून जाते. अपघात खरं तर किरकोळ असतो, पण जयरामचा धूर्त मेव्ह्णा वकील मनोहर बार्रशिंगे (अशोक सराफ) अपघाताकडे पैसे कमावण्याची संधी म्हणून बघायला लागतो. त्यातच त्याला, जयरामला लहानपणीच्या एका अपघातामुळे compressed vertebra झाला आहे असं कळतं. मग तो जयरामला अपंग झाल्याचे नाटक करायला सांगतो, ज्यायोगे कमिशनर बरोबर out-of-court settlement करता येईल. त्यातच जयरामचं कमिशनरच्या बहिणीवर प्रेम बसतं, व ह्या कहाणीमधे अजून थोडासा गोंधळ होतो.

आता पुढे नेमकं काय होतं, मनोहरला पैसी मिळतात का, जयरामला त्याचं प्रेम मिळतं का, हे सगळं कळण्यासाठी सिनेमा पहा. अगदीच दुसरं काही करायला नसेल तर.

ह्या सिनेमात सचिनने मनमोहन देसाईंच्या फ़िल्म मधे असायचे तसे योगायोग, बिछडे हुए जुडवे भाई, वगैरे असलाही मसाला घातला आहे. जयराम ज्या हॉस्पीटल्मधे अ‍ॅडमिट असतो, त्याचं नाव सुद्धा "मनमोहन देसाई जनरल हॉस्पीटल" असं असतं. एवढी तगडी स्टारकास्ट आणि गुंतागुंतीची कथा असूनसुद्धा हा सिनेमा कधीच पकड घेत नाही. कारण ह्या सिनेमात खूप मोठे दोष आहेत. पहिला म्हणजे ह्या सिनेमात खूप आचरटपणा आहे, पण तरीही शहाणपणाचा उगाच आव आणला जातोय असं वाटतं. जर आचरटच सिनेमा काढायचा होता, तर त्यात असला आव अजिबात कामाचा नाही. उदाहरणार्थ, "खिचडी-द मूव्ही" हा सिनेमा पहा. मूर्तीमंत आचरट! पण तरीही हा सिनेमा आवडू शकतो, कारण तो शहाणपणाचा कधी जरासुद्धा आव आणत नाही. सगळी पात्र सगळा वेळ कायम आचरटपणाच करत असतात. ते खपून जातं, कारण प्रेक्षकांची तीच अपेक्षा बनून जाते.

sensible सिनेमात सुद्धा आचरटपण दाखवता येतो, नाही असं नाही. पण त्यासाठी प्लॉट खूपच सशक्त लागतो. "जाने भी दो यारों" मधला नसिरुद्दीन शहा आणि सतिश कौशिक मधला फोनवरचा संवाद आठवा. किंवा त्याच सिनेमातला क्लायमॅक्स मधला महाभारताच्या नाटकाचा सीन आठवा. हे सीन जरी आचरट कॉमेडी मधे मोडत असले, तरीही सिनेमात इतके सहज येतात की ते ऑड वाटत नाही. ह्या सिनेमात मात्र आचरटपणा सिनेमाभर विखूरला गेला आहे, आणि त्यामुळे एखाद्या प्रसंगाची मजा येत असतानाच तो मधेच संपतो, आणि त्यामुळे सिनेमाभर सतत अर्धवट करमणूकीची भावना येत रहाते.

ह्या सिनेमात चीड आणणारी गोष्ट म्हणजे सिनेमातल्या प्रॉडक्ट्सच्या जाहीराती. कुठलतरी मच्छर मारायची कॉईल, लागू बंधू, ब्रूक बॉंड चहा अशा अनेक प्रॉडक्ट्स ची ह्यात जाहिरातबाजी आहे. बरं, नुसती कथेच्या ओघात ही उत्पादनं दाखवली असती तर काही वांधा नव्हता. ह्या प्रत्येक उत्पादनासाठी स्वतंत्र प्रसंग योजला आहे, ही खरी चीड आणणारी गोष्टं आहे. त्यामुळे "प्रेक्षकांचा रसभंग झाला" ही understatement होईल. सचिन त्यांच्या प्रेक्षकांना गृहीत धरायला लागलेत असं वाटायला लागलंय मला. आपण काहीही कचरा तयार केला तरी प्रेक्षक बघतील असं वाटलं की काय त्यांना? तसं असेल तर "आम्ही सातपूते" वरून ते काही शिकले नाही असंच म्हणायला लागेल .
अभिनयाच्या बाबतीत मात्र बोलायला खूप कमी जागा आहे. सर्वच कलाकारांनी मनापासून काम केलं आहे. अशोक सराफ ह्यांच्या टायमिंगची अजून किती चर्चा करणार? संधी मिळताच ते प्रेक्षकांकडून हुकमी हशे वसूल करू शकतात. महेश कोठारे आणि सचिन ने सुद्धा आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. भार्गवी चिर्मुले दिसते छान आणि डान्सही छान करते. सचिन मात्र आता अविवाहित तरूण साकारायच्या वयाच्या पुढे गेले आहेत हे त्यांनी ओळखावं.


एकूण सांगायचं तर,अगदीच वेळ जात नसेल, सगळे मित्र-मैत्रिणी बाहेरगावी गेले असतील, कुठ्लंच काम हाताशी नसेल, सेल फोनवरचा बॅलन्स संपल्यामुळे कोणाशी बोलता येत नसेल, तर हा सिनेमा आवर्जून पहा. कारण तो पाहिल्यावर घरी बसणंच जास्त चांगलं होतं असं तुम्हाला वाटायला लागेल, आणि घरी जायच्या (आयडीयाच्या) कल्पनेने तुम्हाला आपोआप उत्साह येईल..