Monday, December 25, 2006

शोक

आताच एक मित्र मला म्हटला , की त्याची सख्खी बहीण वारली. ष्टोव्ह्च्या स्फोटात जळून मेली.वाचून सुध्धा अंगावर शहारा येतो ना?मला नाही आला.धक्का बसला एवढं नक्की, पण मन मात्र आधीसारखंच शांत होतं.कसली खळबळ नाही की दुःख नाही.त्याचं सांत्वन सुध्धा करता आलं नाही. असा कसा मी दगड झालो? माझ्या एवढ्या चांगल्या मित्राची बहीण स्फोटात जळून जाते आणि मला काहीच वाटत नाही?

असंच ५-६ वर्षांपुर्वी माझ्या एका शाळेतल्या मित्राचे आई-वडील ट्रेनच्या अपघातात गेले. मी २ दिवस त्याला भेटायला देखील गेलो नाही.अशी असते मैत्री?मनात कायम एक भिती होती, की आपण तिथे गेल्यावर मुर्दाडासारखे बसून राहू, आणि त्याचे सांत्वन करणं तर सोडाच, त्याला आपला तिरस्कार वाटू लागेल.तरी धीर करून मी तिस-या दिवशी त्याच्या घरी गेलो. त्याच्या मोठ्या भावाची अन्नावरची वासनाच उडाली होती. तो सतत एका कोप-यात बसून रडत होता, आणि माझ्या मित्रालाच आपल्या मोठ्या भावाचं सांत्वन करायला लागत होतं.एवढं मी सहन करू शकत होतो, पण जेव्हा मी त्याच्या आजोबांच्या डोळ्यात बघितलं, तेव्हा मात्र मला रडू आवरेना.मी त्याचं सांत्वन करायच्या ऎवजी त्यालाच माझं सांत्वन करायला लागू नये म्हणून मी त्याच्या घराबाहेर पडलो आणि पोटभर रडून घेतलं.त्या दिवशी मी देवाला लाख शिव्या दिल्या असतील, पण मित्राशी धीराचा एक शब्द नाही बोलू शकलो.चांगले पांग फेडले १० वर्षांच्या मैत्रीचे.नंतर खूप वाटलं, पण तेव्हा काहीही करू शकत नव्हतो.

आज माझा मित्रपरिवार ब-यापैकी मोठा आहे. इंजीनायरिंग मधले, इथे IIT मधेही बरेच मित्र आहेत. उद्या मला तशीच गरज भासली तर ही सर्व माझ्या मागे खंबीरपणे उभी रहातील ह्याची मला खात्री आहे.मग अशीच खात्री मी स्वतःच्या बाबतीत का देऊ शकत नाही? आपल्या मित्राशी ज्याला चार सहानुभूतीचे शब्द बोलता येत नाहीत,त्याने कुणाच्या जीवावर "मी तुझ्या पाठी सतत उभा आहे" असं इतरांना सांगावं? माझी मित्रांची निवड अचूक आहे. त्यांची मात्र चुकली आहे.............

Monday, December 04, 2006

अज्ञात प्रियतमे.....

अज्ञात प्रियतमे,
त्या दिवशी तुला शेवडेकरांच्या दुकानात(आमच्या इथे सर्व प्रकारचे किराणा सामान, तसेच उत्तम क्वालिटीच्या पायजम्याच्या नाड्या मिळतील.) हिंग विकत घेताना बघितले.मी समोरच भाजी विकत घेत होतो. आणि माझ्या संपादकांकडून "साभार परत" आलेल्या ३७व्या कथेची शपथ घेउन सांगतो, आयुष्यात पहिल्यांदा मी विकत घेतलेल्या टोमॅटोंमधे एकही किडका निघाला नाही. तेव्हाच मला जाणवलं, की हीच ती! पण हाय रे दुर्दैवा! त्या भाजीवाल्याला नेमका त्याच वेळी हिशेबात गोंधळ घालायचा होता!! ते आटपून वर बघेपर्यंत तू दिसेनाशी झालेली होतीस!
त्यानंतर मी झपाटलेल्या अवस्थेत घरी येउन माझी नवी कथा सुरू केली. काही झालं तरी जित्याची खोड!!महिन्याकाठी एक तरी कथा संपादकाकडून साभार परत आल्याशिवाय मला स्वस्थ झोपच लागत नाही.तसा मी एका शाळेत मराठीचा मास्तर आहे.पण शाळा म्युनिसीपालिटीची असल्यामुळे काम असूनही 'बेकार'च आम्ही.त्यानंतर रोज माझे डोळे तुलाच शोधायचे त्या गल्लीत.तेवढ्यासाठी मी दहादा तरी शेवडेकरांच्या दुकानात( आमच्या इथे... इ.इ...)खेपा घातल्या, आणि नको असतानाही, उगाचच, कोणाला संशय येऊ नये म्हणुन दहादा हिंग विकत घेतलं.दहाव्यांदा हिंग घेतलं तेव्हा तर शेवडेकर माझ्याकडे संशयाने बघायला लागले.शेवट्च्या खेपेला मी धीर करून," त्या दिवशी तुमच्याकडून हिंग घेउन गेली ती कोण?' असं शेवडेकरांना विचारलं देखील.तर त्यावर त्यांनी कुठल्याही पुणेरी दुकानदाराप्रमाणे," आम्ही इथे धंदा करायला बसतो. बायका बघायला नव्हे.." असं अत्यंत उर्मट उत्तर देउन मला वाटेला लावलं.
थोड्या दिवसांनी एका संध्याकाळी तुला एका घरात शिरताना बघितलं, आणि परत एक्दा पु.लं.च्या नाथा कामत प्रमाणे,' महिरून गेलो'. थोडी चौकशी केल्यावर त्या घरात एक अत्यंत तापट रिटायर्ड कर्नल रहातो असं कळलं, त्यामुळे पुढे काही करायला धजावलो नाही.
आता यावरून मी किती हिंमतवाला आहे हे तुला कळलं असेलच. पुढे जे काय झालं, त्यापेक्षा वेगळं दुसरं काय होणार होतं?तुझ्या घरात लग्नाचा मांडव दिसला आणि काय समजायचं ते समजलो.त्या दिवशी जेवढा निराश झालो होतो तेवढा माझी पहिली कथा परत आली तेव्हाही झालो नव्हतो.
तुझं नाव मला कळलं नाही हे माझं नशीबच म्हणायला हवं. अनामिक दु:खं विसरायला सोपी असतात म्हणे.........

तुझा (होऊ इच्छीलेला) प्रियकर.......