Thursday, March 29, 2007

द्वैत.

सकाळी उठल्यापासून "त्या"ची कटकट सुरू होते.९ वाजता क्लास असतो, म्हणून वास्तविक मी चांगला ८ वाजताचा अलार्म लावून ठेवतो.तो बरोबर ८ला वाजतोही. आणि मला जागही येते.ह्या तिन्ही गोष्टी एकदम घडल्याच्या आनंदात मी उठतो आणि खोलीचं दार उघडतो न उघदतो तोच त्याचा आवाज येतो," काय ९ वाजता क्लास आहे ना? मग आत्तापासून उठून काय दिवे लावणार आहेस घोड्या?झोप परत. ८ला उठतोय लेकाचा." ह्या भीषण भडिमारापुढे मी सपशेल शरणागती देतो आणि निमूटपणे कॉटवर आडवा होतो आणि ८:२० चा अलार्म लावतो. आता तसं पहायला गेलं तर ८:२० आणि ८:३० मधे असा कितीसा फरक आहे म्हणा! त्यामुळे अर्थातच मी ८:२०च्या ऎवजी ८:३० ला दचकून उठतो. डोळ्यासमोर instructor चे भयावह मुद्रा तरळते आणि मी ताड्कन जागा होतो आणि पुन्हा एकदा मगाशी बंद केलेले दार उघडतो. ह्यावेळी मात्र तो काही बोलत नाही. ही त्याची मूक संमती समजून मी आन्हिकं उरकायला लागतो. फक्त दात घासून रात्री घातलेली हाफ पॅंट बदलून त्यातल्या त्यात स्वछ बाहेर घालायची पॅंट घालणे ह्या क्रियेला hostelite विद्यार्थ्यांमधे आन्हिकं असंच म्हणतात. मग मी आणि तो बरोबरच क्लासला जायला निघतो. तेही एकाच सायकलवर.क्लासमधे मात्र तो मला त्रास द्यायला येत नाही.मात्र क्लास सुटला की रावजी हजर!

सतत मजा करणं हा त्याचा स्वभाव. मलाही तो त्याच्याबरोबर ओढून नेतो. मी तरी दर वेळी का त्याच्यामागे जातो कळत नाही.कधी कधी मात्र मी बंड पुकारून त्याच्याबरोबर जायचं नाकारतो. तो चिडतो, धुसफुसतो, आणि रागावून निघून जातो. माझाही नाईलाज असतो. काही महत्वाचा अभ्यास संपवणं अतिशय गरजेचं असतं.गेला तर गेला! येईल झक मारत परत! त्याला माझ्याशिवाय दुसरं आहेच कोण! मी त्याच्यशी दिवसभर बोलत असतो. एखाद्या प्रसंगी कसं वागावं, कसं बोलावं ह्यावर तो मला सारखं सुनावत असतो.मलाही त्याचे लेक्चरबाजी अजिबात कंटाळवाणी वाटत नाही. इतकच काय, मुलींशी कसं बोलावं हेही तच मला शिकवतो!तो काय मुलींशी बोलण्यात expert वगैरे आहे अशातला भाग नाही. पण सारखे सल्ले द्यायची सवय!त्याला कोण काय करणार?

रात्री बिछान्यावर पडल्यावर मात्र आमचा हा दिवसभर चाललेला, मनातला संवाद मी संपवतो. 'तो', म्हणजे माझ्याच मनात दडलेला एक दुसरा 'मी' ,आम्ही दोघंही शांतपणे झोपी जातो, उद्या सकाळच्या ८:०० वाजताच्या अलार्म ची वाट बघत!

Friday, March 16, 2007

भविष्य

गिरीश रानडे हा एक सर्वसामान्य उच्चशीक्षित तरूण होता. लग्न,संसार सारं काही सुरळीत सुरू होतं.एकंदरीत सुखवस्तू म्हणतात तसला गृहस्थ. एकच समस्या होती. त्याचा ज्योतीषावर जरा जास्त विश्वास होता. हे त्याच्या बायकोला अजिबात आवडायचं नाही. ती त्याला सारखं म्हणायची, हे तुझं ज्योतीषच एक दिवशी आपला घात करेल.पण तिचं भविष्य एवढ्या भयानक रितीने खरे ठरेल असं त्याल स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं........

त्या दिवशी गिरीष जरा लवकर कामावर निघाला होता.जाताना वाटेत, त्याला त्याच्या गाडीतून, कोप-यावर एक ज्योतिषी बसलेला दिसला.लगेच त्याला वाटलं, चला बघुया तर खरं काय लिहीलंय आपल्या भाग्यात आज! लगेच स्वारीने गाडी तिकडे वळवली.ज्योतिषाने जे भविष्य सांगितलं ते ऎकून मात्र गिरीष हादरला.त्याला क्षणभर काही सुचेनाच. जरा भानावर आल्यावर त्याने विचार केला," जर हे भविष्य मला खोटं ठरवायचं असेल, तर मला आज कोणाशीही भेटून चालणार नाही. आजचा दिवस अगदी एकट्याने घालवायला हवा." त्याने लगेच बायकोला फोन करून सांगितलं," मला आज तातडीचं काम निघालं आहे, त्यासाठी बाहेरगावी जावं लागेल. मी उद्या सकाळी परत येईन." त्याने तडक गाडी मागे वळवली, आणि शहरातलं एका चांगल्याशा हॉटेलात गेला. तिथे एका दिवसापुरती खोली भाड्याने घेतली. उरलेला संपूर्ण दिवस त्याने खोलीवरच काढला. जेवणही तिथेच मागवलं. त्या रात्री,ते भविष्य आपण टाळलं असा विचार करत तो शांतपणे झोपला. पण नियती थोडीच झोपी जाते? तिचे पडद्यामागचे खेळ सुरूच असतात...

दुस-या दिवशी सकाळी गिरीष उठला. प्रातर्विधी उरकून त्याने वेटर्ने सकाळेच बाहेर आणून ठेवलेला पेपर उचलला.पहिल्या पानावरची ती बातमी पाहून तो हादरलाच!

"नामवंत सर्जन डॉ. गिरीष रानडे ह्यांच्या पत्नीचे अपघाती निधन"

काल दुपारी, नामवंत सर्जन डॉ.गिईष रानडे ह्यांच्या पत्नी, सौ.प्रमिला रानडे, बाजारःआत करून परत येत असताना त्यांच्या दुचाकीला एका भरदाव ट्रकने धडक मारली.सौ.रानडे जागीच बेशुद्ध झाल्या. जमावाने त्यांना जवळच्याच हॉस्पीटलमधे भरती केलं. योगायोग म्हणजे ते हॉस्पीटल त्यांचे यजमान डॉ.गिरीष रानडे यांचच होतं.पण हॉस्पीटल मधल्या स्टाफने सांगितलं की आज डॉक्टर हॉस्पीटल मधे आलेच नाहीत, व त्यांचाही मोबाईलही बंद होता .सौ. रानडेंचं तातडीने ऑपरेशन करणं गरजेचं असल्यामुळे त्यांना नाईलाजाने दुस-या होस्पीटलमधे भरती करण्यास न्यावं लागलं. दुर्दैवाने वाटेत ambulance ट्रॅफिक जॅम मधे अडकल्याने दुस-या हॉस्पीटलला पोचायच्या आतंच त्यांचं निधन झालं. त्यानंतर अजुनही डॉक्टरांशी संपर्क होऊ शकलेला नाही.....

भोवळ येऊन पडण्यापुर्वी गिरीषला ज्योतिषाचं भविष्य आठवत होतं, " आज तुमच्या चुकीमुळे अथवा निष्काळजीपणाने, तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जिवाला धोका पोचू शकेल..............."